राष्ट्रीय

अरुणाचलमध्ये ‘ड्रॅगन’ची आगळीक; पण वाघांच्या डरकाळीने पळता भुई!

निलेश पोतदार

इटानगर : वृत्तसंस्था

चिनी लष्करातील सैनिकांनी भारताच्या (अरुणाचल प्रदेश) हद्दीत शिरून आगेकूच करण्याचा शनिवारी प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यावर जोरदार हरकत घेतली… खबरदार, जर एक पाऊल आणखी पुढे टाकाल तर…, अशी थेट धमकी देत भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावले.

या घटनेचा व्हिडीओही समाजमाध्यमांतून व्हायरल झाला आहे. भारतीय जवानांचे मनोबल चिनी सैनिकांच्या तुलनेत किती तरी जास्त असल्याचे या व्हिडीओतून अधोरेखित झाले. अर्थात, भारतीय लष्कर वा संरक्षण मंत्रालयातर्फे या घटनेबद्दल कुठलेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने सीमेवरील जवानांना आपत्कालीन स्थितीत स्वयंनिर्णयाचे अधिकार
बहाल केलेले आहेत, यातच सगळे आले!

अरुणाचल प्रदेशातील 'बुम ला व्हॅली' भागात 1962 च्या भारत-चीन युद्धात चिनी आणि भारतीय लष्करात भीषण रणसंग्राम झालेला आहे. आता या भागात 'आयटीबीपी'चे (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) जवान अहोरात्र चिन्यांवर नजर रोखून असतात. अरुणाचलमध्ये चीनची आगळीक गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढलेली आहे. अरुणाचल प्रदेश आपल्या नकाशात दाखविणे, अरुणाचलातील ठिकाणांची नावे बदलणे, वास्तविक नियंत्रण रेषेलगत आपल्या हद्दीत गावे वसविणे आदी प्रकार चीनकडून सुरू आहेत.

वरील घटनेत भारत आणि चीनचे जवान जेव्हा समोरसमोर आले तेव्हा सुरुवातीला चिनी सैनिकांनी गुरगुर केली; पण भारतीय जवानांनी त्याला डरकाळीने उत्तर देताच बर्‍या बोलाने; पण असहाय्यपणे चिनी सैनिक मागे सरकले.

दोन्ही बाजूंतील संभाषण असे…

भारतीय सैन्य अधिकारी : (इंग्रजीत) आम्ही सीमेवर 'जैसे थे' स्थिती कायम राहावी म्हणून बांधील आहोत, तुम्ही तसेच करावे, कळले का?
चिनी अधिकारी : हो… हो… मी समजू शकतो. तुमच्याच (भारतीय लष्करातील) कमांडरने आम्हाला सांगितले होते की, तुम्ही इथपर्यंत येऊ शकता म्हणून… आणि अर्थातच तुम्हीही इथपर्यंत येऊ शकता…

भारतीय सैन्य अधिकारी : हो… हो… मलाही कळते… मी आमच्या कमांडरशी बोलेन; पण आता बर्‍या बोलाने मागे सरकायचं… समजलं का?

SCROLL FOR NEXT