पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय हवामान विभागाने सोमवार २३ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानुसार नैऋत्य मान्सूनच्या परतीला आजपासून (दि.२३ सप्टेंबर) प्रारंभ झाल्याची माहिती स्वत: हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनमध्ये दिली आहे.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी सोमवार २३ सप्टेंबर म्हणजेच आजपासून नैऋत्य मान्सूनची माघार सुरू झाली आहे, असे एक्स पोस्ट करून सांगितले आहे. त्यांनी हवामान विभागाचे बुलेटीन शेअर केले आहे त्यामध्ये म्हटले आहे की, दरवर्षी भारतातील नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा १७ सप्टेंबरपासून सुरू होतो. मात्र यंदा तब्बल ६ दिवस मान्सून उशीरा माघारी फिरला आहे. पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील कच्छ मधील काही भागातून मान्सून परतीला प्रारंभ झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढील २४ तासात पश्चिम राजस्थान, राजस्थानकडील पंजाबचा काही भाग, हरियाणा आणि गुजरातमध्ये मान्सून परतीला अनुकूल परिस्थिती असेल, असेही हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे.