Prashant Kishor Bihar Election 2025 Pudhari
राष्ट्रीय

Bihar Election 2025: पीकेचा प्लॅन फसला! जन सुराज पार्टीला लोकांनी नाकारलं; पराभवामागील 5 मोठी कारणे कोणती?

Jan Suraaj’s Election Setback: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा आत्मविश्वास प्रत्यक्ष निकालांमध्ये दिसलाच नाही. ग्रामीण भागात कमी पोहोच आणि जातीय समीकरणांवर मात न करता आल्याने पक्ष पिछाडीवर राहिला.

Rahul Shelke

Prashant Kishor Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चा जर कोणाची झाली असेल, तर ती प्रशांत किशोर आणि त्यांच्या नव्या ‘जन सुराज’ पक्षाची. निवडणूकपूर्व काळात पीके यांनी राज्यभर काढलेल्या पदयात्रा आणि सभांमुळे त्यांच्या पक्षाकडून मोठ्या उलथापालथीची अपेक्षा निर्माण झाली होती. परंतु मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यांतच जन सुराजचा प्रभाव दिसेना, आणि बहुतांश मतदारसंघांमध्ये पक्ष पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

राज्यातील पारंपरिक सत्तासमीकरणांमध्ये बदल घडवण्याचा दावा करणाऱ्या जन सुराजला मतदारांनी का डावलले? पीके यांची ‘जादू’ प्रत्यक्ष राजकारणात का चालली नाही? यामागील कारणांचा आढावा आपण घेऊयात.

1) ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयश

बिहार हा ग्रामीण वस्तीचं राज्य आहे आणि तिथे जन सुराजची ओळख अजून पक्की झालेली नव्हती. पीके यांच्या पदयात्रेने चर्चेला ऊत आला असला तरी गावागावात पक्षाचं चिन्ह, उमेदवार, आणि प्रत्यक्ष कामकाजाबाबत जागरूकता नव्हती. त्यामुळे पक्षाचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

2) संघटन मर्यादित आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

जन सुराजने पारंपरिक पक्षसंरचनेऐवजी ‘नेता केंद्रित ब्रँडिंग’वर भर दिला. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट न मिळणं, बाहेरून आलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणं या निर्णयांमुळे संघटनेत रुसवे फुगवे निर्माण झाले. काही प्रभावी लोकांनी तर पक्षच सोडला, ज्यामुळे निवडणुकीच्या थेट तयारीतच जन सुराज कमकुवती पडली.

3) बिहारच्या जातीय राजकारणात घुसता न येणं

राज्याची निवडणूक जात, धर्म आणि पारंपरिक गटांभोवती फिरते. जन सुराजचा अजेंडा विकास, रोजगार आणि शिक्षणासारख्या मुद्द्यांवर केंद्रीत असला तरी तो जातीय निष्ठेच्या भिंती मोडू शकला नाही. अल्पसंख्याक आणि इतर अनेक सामाजिक गटांनी सुरक्षिततेसाठी महाआघाडी किंवा एनडीएचे पारंपरिक पर्यायच निवडले.

4) विरोधकांचा दबाव व उमेदवारांची माघार

पीके यांनी अनेकदा आरोप केला की जन सुराजच्या उमेदवारांवर दबाव आणून, धमकावून किंवा प्रलोभन देऊन त्यांना माघार घेण्यास भाग पाडलं गेलं. काही ठिकाणी उमेदवारांनी माघारही घेतली. यामुळे पक्षाच्या निवडणूकपूर्व प्रतिमेला धक्का बसला.

5) प्रशांत किशोर स्वतः मैदानात उतरले नाहीत

पक्षाचा चेहरा असणाऱ्या पीके यांनी स्वतः निवडणूक न लढवणं हा मोठा मुद्दा होता. करिश्माई नेता थेट जनादेश मागायला पुढे आला की मतदारांचा विश्वास अधिक दृढ होतो. परंतु पीके मैदानाबाहेर राहिल्याने अनिश्चितता वाढली आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

जन सुराज ही नवीन विचारसरणीवर आधारित चळवळ असली तरी बिहारसारख्या गुंतागुंतीच्या राज्यात ती अजून मजबूत स्थितीत नाही. संघटनेची उणीव, ग्रामीण ओळख कमी पडणे, जातीय समीकरणं आणि विरोधकांचा दबाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून पक्षाचा प्रभाव अपेक्षेपेक्षा कमी झालेला दिसत आहे. पीके यांचा प्रयोग अपयशी ठरला असे म्हणण्यापेक्षा जन सुराजला अजून वेळ, समन्वय आणि जास्त काम करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT