Reliance : रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण असेल? मुकेश अंबानी यांनी केली ही मोठी घोषणा  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Reliance : रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण असेल? मुकेश अंबानी यांनी केली ही मोठी घोषणा

रिलायन्समधील दैनंदिन व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून उत्तराधिकार योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Who will be Reliance's successor? Mukesh Ambani makes this major announcement

पुढारी ऑनलाईन : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या उत्तराधिकार योजनेबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की रिलायन्समधील दैनंदिन व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून उत्तराधिकार योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

तीनही मुले सांभाळत आहेत प्रमुख व्यवसाय

अंबानी यांनी सांगितले की त्यांची तीनही मुले – आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी – गेली तीन वर्षे रिलायन्सच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत आणि कंपनीच्या महत्त्वाच्या व्यवसायांची जबाबदारी सांभाळत आहेत. आकाश अंबानी तंत्रज्ञान आणि दूरसंचार व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. ईशा अंबानी रिटेल व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. अनंत अंबानी ऊर्जा आणि नव्या ऊर्जा व्यवसायांचे नेतृत्व करत आहेत.

“तीन शरीरे, एक आत्मा”

भविष्यात रिलायन्स समूह विभागला जाणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी म्हणाले, “ही तीन शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच आहे आणि तो म्हणजे रिलायन्स.” त्यांनी भागधारकांना आश्वस्त केले की कंपनीचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे आणि पुढील पिढी रिलायन्सला आणखी उंचीवर नेईल.

५०० युवा नेत्यांची तयारी

अंबानी यांनी सांगितले की समूहाने विविध व्यवसायांसाठी ३० ते ४० वयोगटातील सुमारे ५०० युवा नेत्यांना प्रशिक्षित केले आहे. हे नेते तांत्रिक कौशल्य, क्षेत्रातील अनुभव आणि पहिल्या पिढीचा उद्योजकीय उत्साह घेऊन पुढे येत आहेत.

“मी अजूनही सक्रिय आहे”

मुकेश अंबानी म्हणाले की ते अजूनही कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. मात्र, दैनंदिन जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण आता अंतिम टप्प्यात आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ एप्रिल २०२९ मध्ये संपणार आहे.

उत्तराधिकाराबाबतची चिंता दूर करण्याचा प्रयत्न

अंबानी यांनी स्पष्ट केले की पुढील पिढीच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचे विविध व्यवसाय वेगवेगळ्या दिशांनी जाणार नाहीत. तिन्ही भावंडे स्वतंत्र क्षेत्रांचे नेतृत्व करत असली तरी रिलायन्सच्या एकूण विकासासाठी एकत्रितपणे काम करत आहेत.

रिलायन्समधील अंबानींचा प्रवास

मुकेश अंबानी १९७७ मध्ये, कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्याच वर्षी, वयाच्या २०व्या वर्षी रिलायन्सच्या संचालक मंडळात सहभागी झाले. २००२ मध्ये रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली.

त्यानंतर वडिलांनी इच्छापत्र (वसीयत) न ठेवल्यामुळे कंपनीच्या नियंत्रणावरून त्यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याशी वाद निर्माण झाला होता. मात्र, त्या अनुभवातून शिकत अंबानी यांनी आता रिलायन्सच्या उत्तराधिकाराची स्पष्ट दिशा निश्चित केल्याचे संकेत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT