Chandranath Rath Murder West Bengal: पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे विश्वासू सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर बंगालमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
41 वर्षीय चंद्रनाथ रथ हे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूर येथील रहिवासी होते. शांत स्वभाव आणि लो-प्रोफाइल व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे रथ हे गेल्या काही वर्षांत सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बनले होते.
त्यांनी राहरा रामकृष्ण मिशनमध्ये शिक्षण घेतले होते. त्यानंतर जवळपास 20 वर्षे त्यांनी भारतीय वायुदलात सेवा बजावली. रामकृष्ण मिशनमधील शिक्षण काळात ते अध्यात्मिक विचारांनी प्रभावित झाले होते आणि काही काळ त्यांनी आध्यात्मिक जीवनाचाही विचार केला होता, असे त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले.
भारतीय वायुदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. नंतर ते हळूहळू राजकीय संघटनात्मक कामांकडे वळले. प्रशासकीय समन्वय, पक्षाचे नियोजन आणि निवडणूक व्यवस्थापन यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांचे कुटुंब पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते. त्यांच्या आई हसी रथ या स्थानिक पंचायतमध्ये काम करत होत्या. मात्र, 2020 मध्ये सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये गेल्यानंतर रथ कुटुंबही भाजपमध्ये दाखल झाले.
चंद्रनाथ रथ हे केवळ पीए नव्हते, तर सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय प्लॅनिंगचे महत्त्वाचे सूत्रधार मानले जात होते. नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातील निवडणूक व्यवस्थापनात त्यांची मोठी भूमिका होती. पक्षातील कार्यकर्त्यांपासून ते लॉजिस्टिक व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टी ते हाताळत होते.
भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना “Mr Dependable” अशी उपमा दिली होती. भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी सांगितले की, विधानसभेतील अधिकारी यांचं जवळपास सगळं काम चंद्रनाथ रथ सांभाळत होते.
या हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. बंगालमध्ये आधीपासूनच राजकीय तणावाचं वातावरण आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे राज्यातील वातावरण आणखी तापलं आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “ही थंड डोक्याने केलेली हत्या आहे. गेल्या काही दिवसांपासून रेकी करण्यात आली होती. मात्र, लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा,” असे आवाहन केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हत्या राजकीय कारणांमुळे झाली का, याचाही तपास केला जात आहे. चंद्रनाथ रथ यांच्या मृत्यूमुळे भाजपमध्ये शोककळा पसरली असून, राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.