पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेने भारतीय निर्यातीवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचा घेतलेला निर्णय आमच्या अर्थव्यवस्थेचा विध्वंस करणार आहे, असे प्रतिपाद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी लोकसभेत बोलताना केले.
तुम्ही चीनला 4000 चौरस किलोमीटर जमिन दिली. आमचा मित्रदेश (अमेरिका) अचानक आमच्यावर 26 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतो. ज्यामुळे आमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, ऑटोमोबाईल-फार्मा उद्योग धोक्यात आहेत. केंद्र सरकार याबाबत काय करणार आहे? यावर राहुल यांनी केंद्र सरकारकडून उत्तर मागितले.
राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान आणि त्यांची आजी इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, एकदा कोणीतरी इंदिरा गांधींना विचारले की त्या परराष्ट्र धोरणात डावीकडे झुकतात की उजवीकडे? त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की मी डावीकडे किंवा उजवीकडे झुकत नाही.
मी भारतीय आहे आणि सरळ उभी राहते. पण भाजप आणि RSS ची विचारसरणी वेगळी आहे. जर तुम्ही त्यांना विचारले की ते डावीकडे झुकतात की उजवीकडे तर ते म्हणतात, 'नाही नाही नाही, आम्ही प्रत्येक परदेशी पाहुण्याच्या पुढ्यात डोकं टेकवतो."
राहुल गांधी म्हणाले, "हे सर्वांना माहीत आहे की चीनने आपल्या 4000 चौरस किलोमीटर जमिनीचा ताबा घेतला आहे. आपल्या परराष्ट्र सचिवांनी चीनच्या राजदूतासोबत केक कापला तेव्हा मला धक्का बसला. ह्या जमिनीचे नेमके काय चालले आहे?
20 जवान शहीद झाले. केक कापणे हा त्यांच्या बलिदानाचा अपमान आहे. राहुल गांधी यांनी 2020 च्या गलवान खोऱ्यातील संघर्षाचा संदर्भ घेत सरकारला प्रश्न विचारला. विरोधक भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या विरोधात नाहीत. पण संबंध सुधारण्याआधी आपली जमीन परत मिळवायला हवी, असेही राहुल म्हणाले.
राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, "कोणत्या सरकारने अक्साई चीन गमावला? 1962 मध्ये जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते, तेव्हा चीनने आक्रमण केले आणि भारत युद्ध हरला. आम्ही 'हिंदी-चिनी भाई भाई' म्हणत राहिलो आणि त्यांनी पाठीत सुरा खुपसला.