Assam, W. Bengal Election | अमित शाह निवडणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, जे. पी. नड्डा यांच्याकडे आसामची जबाबदार 
राष्ट्रीय

Assam, West Bengal Election | अमित शहा निवडणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, जे. पी. नड्डा यांच्याकडे आसामची जबाबदारी

पक्षाकडून केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी, पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी याठीकाणी भाजप करणार सत्तास्थापन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ नेता निवडीसाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आसामसाठी ही जबाबदारी पक्षाचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे देण्यात आली आहे. 

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी या ठिकाणी नेत्रदीपक यश मिळवले. या तिन्ही ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, यामध्ये पश्चिम बंगालचे महत्त्व विशेष आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूलच्या मजबूत सत्तेला उलथवून भाजपने यश मिळवले आहे. त्यामुळे स्वाभाविकच इथे कोण मुख्यमंत्री होणार हेही महत्वाचे आहे. आगामी काळात सत्तेच्या माध्यमातून अधिक मजबूत होण्यावर पक्षाचा भर असेल. या पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विधीमंडळ नेते निवडीची जबाबदारी दिली आहे. अमित शाह केंद्रीय निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी सह निरीक्षक नेमले आहेत. त्याचप्रमाणे आसाममध्ये विधिमंडळ नेता निवडीची जबाबदारी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना दिली आहे. त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांना सह निरीक्षक नेमले आहे.

अमित शाह आज बंगाल दौऱ्यावर!
अमित शाह यांना पश्चिम बंगालची जबाबदारी दिल्यानंतर ते आज (बुधवारी) कोलकात्यासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होऊ शकते. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी येत्या ९ मे रोजी होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी सांगितले. तत्पूर्वी विधीमंडळ नेता निवडीसाठी होणाऱ्या बैठकीला निरीक्षक, सह- निरीक्षक यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि आमदारांची उपस्थितीत असणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने २९४ पैकी २०६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. तर आसाममध्ये १२६ पैकी विक्रमी ८२ जागा मिळवल्या आहेत.  

अमित शाह निरीक्षक म्हणून का महत्वाचे?
पश्चिम बंगालमधील निवडणुकीची धुरा बहुतांश प्रमाणात अमित शाह यांच्याच खांद्यावर होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचाराची रणनीती आणि एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये अमित शाह हेच प्रमुख भूमिकेत होते. निवडणूक काळात तब्बल १५ दिवस अमित शाह बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे अमित शाह यांचे स्वतःचे महत्त्वपूर्ण निरीक्षण बंगालबद्दल असतील. मागील ३ निवडणुकामध्ये देखील बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न होता. या सर्व प्रयत्नातही अमित शाह अग्रस्थानी होते. त्यामुळे अमित शाह बंगालचे निरीक्षक असणे, हे खूप महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT