पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मानाजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. (Uttarakhand avalanche ) घटनास्थळी २४ तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू असून, आज (१ मार्च) भारतीय सैन्याला आणखी १४ कामगारांना बाहेर काढण्यात यश आहे. तीन जखमींना हेलिकॉप्टरने जोशीमठ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच वृत्त ANI ने दिले आहे.
शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजता उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन झाले. बद्रीनाथपासून ३ किमी अंतरावर असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली.बर्फाचा ढिगारा कोसळला आणि ५५ लोक अडकले. शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. आज सकाळी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. तीन जखमी कर्मचाऱ्यांना भारतीय सैन्याने भाड्याने घेतलेल्या नागरी हेलिकॉप्टरद्वारे माना येथून जोशीमठ येथे गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले आहे .८ जणांचा शोध सुरू आहे. लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत.
हिमस्खलनात अडकलेल्या ५५ कामगारांमध्ये बिहारचे ११, उत्तर प्रदेशचे ११, उत्तराखंडचे ११, हिमाचल प्रदेशचे ७, जम्मू-काश्मीरचे १ आणि पंजाबचे १ कामगारांचा समावेश आहे. उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या यादीत १३ कामगारांची नावे आहेत, परंतु त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर नाहीत. उर्वरित कामगारांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधत माना येथे अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली. त्यांनी राज्यातील पाऊस आणि हिमवृष्टीच्या परिस्थितीचीही सविस्तर माहिती देखील घेतली. पंतप्रधानांनी आश्वासन दिले की, केंद्र सरकार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल."