Uttar Pradesh Marriage News
लग्नातील काही विधी हे नातेसंबंध मजबूत करतात. लग्नात दंगा, मस्ती आणि आनंदी आनंद असतो. पण उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका हलक्या-फुलक्या विधीमुळे आनंदावर विरजण पडले आणि वराला वधूशिवाय घरी परतावे लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नातील विधीदरम्यान हसत-खेळत बोलणे सुरू झाले, पण त्यानंतर वाद इतका वाढला की पोलिसांना बोलावण्याची वेळ आली. त्यानंतर रात्रभर पंचायत सुरू राहिली.
ही घटना कासगंज जिल्हा पोलिस ठाण्याच्या राजा का रामपूर भागातील लुहारी गावातील आहे. विटोना गावातून एक लग्नाचे वऱ्हाड इथे आले होते. लग्नाची सर्व तयारी मोठ्या धामधुमीत करण्यात आली. वऱ्हाड मंडळीच्या खाण्यापिण्यापासून ते लग्नापर्यंत सर्व विधी आनंदात पार पडले. लग्न मंडपात सगळे काही व्यवस्थित चालले होते, पण लग्नात जेव्हा नवरदेवाचे बुट लपवण्यास सुरुवात झाली तेव्हा आनंदावर विरजण पडले. या विधीदरम्यान नवरी मुलीच्या बहिणीने गमतीने नवऱ्या मुलाकडे १ हजार रुपये मागितले, पण वराने केवळ २०० रुपये देणार असल्याचे सांगितले. यावर वाद झाला. वराचे वडील शाकिब खान यांनी नवऱ्या मुलीच्या बहिणीचा हात धरला आणि 'पायात बूट घाला, तरच तुम्हाला पैसे मिळतील' असे म्हटले. तेव्हा वाद आणखी वाढला.
आम्ही आमच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला. लग्नाचे सर्व विधी पार पाडले. पण त्यांच्या मुलीचा लग्नमंडपात सर्वांसमोर अपमान करण्यात आला. ज्याचे आम्हाला खूप वाईट वाटले म्हणून आम्ही मुलीची पाठवणी केली नसल्याचे मुलीची आई रिहाना आणि वडील लाल मुहम्मद यांनी सांगितले. एवढेच नाही तर मुलीकडून आरोप करण्यात आला की मुलाच्या आईने सांगितले की ते मुलीला डिग्गीत घालून घेऊन जातील. वराच्या बहिणीने म्हटले होते की ते तिला घरी घेऊन गेल्यानंतर मारतील. या भीतीने आम्ही आमच्या मुलीची सासरी पाठवणी केली नाही.
जेव्हा वाद चिघळला तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रात्रभर पंचायत सुरू राहिली. पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. परिणामी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, वर आणि त्याच्या कुटुंबीयांना वधूला न घेताच माघारी परतावे लागले. वराचे वडील शाकिब खान यांनी आमची चूक झाल्याचे कबुल केले.
ते म्हणाले की, आम्ही हात जोडून माफीही मागितली. पण वधूचे कुटुंबीय एका गोष्टीवर ठाम राहिले की ते वधूची पाठवणी करणार नाहीत. सध्या दोन्हीकडील घरच्यांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावातील लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले की एका साध्या विधीदरम्यान इतका मोठा वाद कसा निर्माण केला.