राष्ट्रीय

तेलंगणा आंदोलनातील शहिदांचे स्वप्न केवळ भाजपच पूर्ण करणार : अमित शहा

Arun Patil

हैदराबाद, वृत्तसंस्था : स्वतंत्र तेलंगणा आंदोलनात शहीद झालेल्यांचे स्वप्न केवळ भाजप पूर्ण करणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मकतल येथील प्रचारसभेत केले. तत्पूर्वी, मुनुगोडे येथे शहा यांचा भव्य रोड शोही येथे झाला.

बीआरएस सरकारवर तोफ डागताना ते म्हणाले, की मोदी सरकारने मच्छीमारांसाठी मत्स्य पालन मंत्रालय स्थापन केले. केसीआर यांनी मच्छीमारांसाठी काहीही केले नाही. तेलंगणात सरकारमध्ये आलो तर आम्ही मच्छीमारांसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी उभारू. वीणकरांसाठीही केसीआर यांनी काही केलेले नाही. आम्ही या वर्गाच्या प्रगतीसाठी योजना आणू, असे आश्वासन शहा यांनी दिले.

तेलंगणात सत्ताधारी बीआरएस आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राव यांनाच पुन्हा संधी मिळावी म्हणून सौदा झालेला आहे, असा आरोप शहा यांनी केला. या सौद्यान्वये शहा हे नंतर राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्यात मदत करणार आहेत, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे आमदार हे चिनी वस्तूंसारखे तकलादू असतात. ते केव्हा बीआरएसमध्ये चालले जातील, याचा भरवसा नाही, अशी कोटी त्यांनी केली.

SCROLL FOR NEXT