नवी दिल्ली : यूजीसी-नेट जून २०२६ परीक्षेची कथित पेपरफुटी झाल्याच्या आरोपामुळे राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) पुन्हा एकदा टीकेच्या आणि चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट-यूजी परीक्षेची पेपर फुटल्याची घटना आणि नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील गंभीर चुका व मुद्रणदोष यांच्या तक्रारी समोर आल्यानंतर काही आठवड्यांतच ही नवीन घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाने एनटीएला या आरोपांची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. यूजीसी-नेटच्या समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका निर्मितीशी संबंधित असलेली १०० पानांची पीडीएफ परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फिरवली गेली होती आणि त्यातील सुमारे ९० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत होते, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या कथित अनियमिततेवरून सरकारवर टीका केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. एक्सवर एक वृत्त शेअर करताना राहूल गांधी यांनी दावा केला की, प्रश्नपत्रिका निर्मितीशी संबंधित असलेली आणि केवळ एनटीएकडेच उपलब्ध असायला हवी असलेली पीडीएफ परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर आली होती. ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात झालेल्या यूजीसी नेट परीक्षेबाबत समोर आलेले गंभीर आरोप अत्यंत धक्कादायक आहेत. त्यांनी आरोप केला की, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये ही प्रश्नपत्रिका २.२५ लाख रुपयांना विकली जात होती. तसेच, याच टोळीने सीएसआर-नेट, एचटीईटी आणि एडीए यांसारख्या आगामी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शवली होती, असा दावाही त्यांनी केला.