नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पर्शियन आखातात भारताची 28 जहाजे अडकली असून, एकूण 778 खलाशी या प्रदेशात आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जयस्वाल यांनी सांगितले की, संघर्षग्रस्त प्रदेशात काम करणार्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला भारत सरकार सर्वाधिक प्राधान्य देत आहे. गल्फ सहकार्य परिषद देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय राहतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
व्यापारी जहाजांवर हल्ला; मृत्यूची घटना
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मृत्यू आणि बेपत्ता होण्याची घटना व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांदरम्यान घडली. या जहाजांवर काम करणारे भारतीय नागरिक संघर्षग्रस्त समुद्री मार्गांमध्ये अडकले होते. आम्ही दोन भारतीय नागरिकांना गमावले आहे आणि एकजण अद्याप बेपत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो, असे जयस्वाल यांनी सांगितले. याशिवाय, इस्रायलमध्ये एका भारतीयाला दुखापत झाली असून, दुबईमध्ये घडलेल्या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे.
24 तास नियंत्रण कक्ष सुरू
परिस्थितीचा सामना करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्ली येथे 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष आपत्कालीन फोन कॉल्स स्वीकारत असून, प्रभावित देशांमधील भारतीय दूतावासांशी सतत संपर्क ठेवत आहे. जयस्वाल यांनी सांगितले की, मंगळवारी नियंत्रण कक्षाला 75 फोन कॉल आणि 11 ई-मेल प्राप्त झाले. आम्ही शक्य तितकी मदत करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत.
पंतप्रधान मोदींचा मध्य पूर्वेतील नेत्यांशी संपर्क
या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरात, कतार, सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, जॉर्डन, कुवेत आणि इस्रायल या देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही इराणसह मध्य पूर्वेतील अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.