Twisha Death Case: भोपाळमध्ये ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. मॉडेल ट्विशाच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून ट्विशाचा छळ झाल्याचा आरोप केला आहे. ट्विशाची सासू या सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आहेत तर त्यांचा मुलगा वकील आहे.
दरम्यान, ट्विशाच्या कुटुंबीयांनी आता थेट राष्ट्रपतींकडे न्यायासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी केली आहे. कुटुंबीयांनी जर ट्विशाने स्वतःचे जीवन संपवलं असेल तर तिच्या शरीरावर इतक्या जखमांच्या खुणा कशा होत्या असा प्रश्न विचारला आहे. तसेच तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ट्विशा लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करत होती. त्यांनी दावा केला की ट्विशाने आपल्या जवळच्या लोकांनी सासरी होत असलेल्या छळाबाबत माहिती दिली होती. आता शवविच्छेदन अहवाल आणि त्यात असलेल्या जखमांच्या वर्णनावरून संशय अजूनच गडद होत आहे.
कुटुंबीयांना राष्ट्रपतींना केलेल्या याचनेत या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषींविरूद्ध सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका स्थानिक वकिलांनी भारताचे मुख्य न्यायाधीश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना देखील पत्र लिहून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोएडामध्ये राहणाऱ्या ट्विशा शर्मा १२ मे रोजी भोपाळ येथील कटारा हिल्स भागातील आपल्या सासरच्या घरी फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यानंतर ट्विशाच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा आरोप केला होता. ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिचा पती समर्थ सिंह आणि सासू गिरिबाला सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विशेष म्हणजे ट्विशाची सासू सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना या प्रकरणी जामीन मिळाला आहे. त्या सध्या जिल्हा उपभोक्ता फोरमच्या अध्यक्ष आहेत. त्यांना जामीन मिळाल्यामुळं त्याचा प्रभाव तपासावर होण्याची शक्यता ट्विशाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात कुटुंबीयांनी ट्विशाच्या पतीने साक्षीदारांना प्रभावित करणे, पुराव्याशी छेडछाड करणे आणि महत्वाची फॉरेन्सिक सामुग्री नष्ट केल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळं या प्रकरणाची संवैधानिक अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात मिळालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांना तत्काळ सुरक्षित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.