Train Accident: छत्तीसगडमधील बिलासपूरमधील लालखदानजवळ आज (दि. ४) भीषण रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. बिलासपूरचे जिल्हाधिकार्यांनी ANIशी बोलताना सांगितले की , "बिलासपूरजवळ लोकल ट्रेनचा शेवटचा आणि पहिला डबा आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य सुरू आहे." दरम्यान, अनेक डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
गटोनरा स्टेशनजवळ एक प्रवासी मेमू ट्रेन मालगाडीला धडकली. या दरम्यान मेमू ट्रेनचा एक डबा मालगाडीवर आदळला. . ही ट्रेन दुपारी १:३० वाजता कोरबा येथून निघाली. जयरामनगर स्टेशन दरम्यान ही घटना घडली.वृत्तानुसार, ही टक्कर इतकी भीषण होती की त्यामुळे ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल सिस्टीमचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दुरुस्तीसाठी काही तास लागू शकतात, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी वैद्यकीय पथक आणि बचाव पथक दाखल झाले आहे. स्थानिक प्रशासनही मदत पुरवत आहे. या अपघातामुळे अनेक गाड्यांचे परिवहन विस्कळीत झाले आहे. अनेक गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. रेल्वे पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि तपास करत आहेत. हा अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे मार्गावर घडला, जो सर्वात वर्दळीचा रेल्वे मार्ग आहे. चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालगाडी आणि प्रवासी ट्रेनमधील टक्कर इतकी भीषण होती की प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली. घटनास्थळी प्रवासी आरडाओरडा करत होते. माहिती मिळताच, जवळच्या भागातील लोक घटनास्थळी धावले. रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आणि बचाव आणि मदत कार्य सुरू आहे.