पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीकृष्ण जन्माष्टमी ( janmashtami ) देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त देशभरात २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'(CAIT)ने दिली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा वर्षातील व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय सणांपैकी एक आहे. यंदा झालेली उलाढाल ही देशभरातील ग्राहकांच्या मजबूत क्रयशक्तीवर दर्शवते, असेही 'सीएआयटी'ने नमूद केलं आहे.
कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर जन्माष्टमी साजरी केली. 'सीएआयटी'चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चांदणी चौकातील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, जन्माष्टमीसारखे सण हे आपल्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतात. या सणामध्ये विशेषत: फुले, फळे, मिठाई, देवता वेशभूषा, सजावटीच्या वस्तू, उपवासाच्या मिठाई, सुका मेवा, दूध, दही, लोणी आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष भरतिया यांनी सांगितले की, देशभरात विशेषत: उत्तर आणि पश्चिम भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरे आकर्षकपणे सजवण्यात आली होती, बाजारात ग्राहकांची गर्दी लक्षणीय होती. त्यांनी विशेष आकर्षणे जसे की डिजिटल टॅबॉक्स, भगवान कृष्णासोबत सेल्फी पॉइंट्स आणि इतर आनंददायक प्रदर्शनांवर प्रकाश टाकला. शहरांमध्ये संत-मुनींची असंख्य भजने, धार्मिक नृत्ये आणि प्रवचने झाली. विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी साजरी केली.
या महिन्याच्या सुरुवातीला, CAIT ने राखीच्या सणाच्या वेळी देशभरात सणासुदीच्या व्यापाराचा अंदाज १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राखी सणाचा व्यवसाय २०२२ मध्ये सुमारे सात हजार कोटी कोटी रुपये, २०२१ मध्ये सहा हजार कोटी रुपये 2020 मध्ये 5,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.