नवी दिल्ली; वृत्तसंस्था : तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) संसदेतील ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या पाठिंब्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी एनडीएचा आकडा वाढू शकतो.
राज्यसभेत इंडिया आघाडीचे सुमारे ६४ खासदार असल्याचे सांगितले जात आहे. काही प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेमुळे भविष्यात मतदानावेळी समीकरणे बदलू शकतात. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी निवडणुकांमुळे राज्यसभेतील संख्याबळावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळाल्यास सरकारला संविधान दुरुस्ती, मोठे कायदे आणि धोरणात्मक बदल अधिक सहजपणे करता येतात. यामुळे विधेयक मंजुरी प्रक्रियेत विरोधकांवरील अवलंबित्व कमी होते आणि मोठे राजकीय निर्णय घेणे सोपे होते. यापूर्वी १६ एप्रिल रोजी लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्यामुळे ५४ मतांनी मंजूर होऊ शकले नव्हते.
राज्यसभेत एनडीएकडे सध्या १४८ खासदार आहेत. आगामी निवडणुका आणि काही खासदारांच्या बदलामुळे हा आकडा १५१ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच तृणमूलचे काही खासदार राजीनामा देऊन जागा रिक्त झाल्यास त्या जागांवर एनडीएने पाठिंबा दिलेले उमेदवार निवडून येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत एनडीएची ताकद १५४ पर्यंत पोहोचू शकते. मात्र, दोन-तृतीयांश बहुमतासाठी १६३ खासदारांची आवश्यकता असल्याने एनडीए अजूनही ९ जागा दूर असेल.