Tirupati laddoo row : देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला देवस्थान येथे लाडूच्या नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त तुपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. उत्तराखंडमधील एका डेअरीने कोणत्याही स्रोताकडून दूध न घेता मंदिरात ६८ लाख किलो बनावट तूप पुरवले. ज्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये आहे.
भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टर सारखी विविध रसायने पुरवणाऱ्या अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर सीबीआयला फसवणुकीची माहिती मिळाली. तिचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी चालवलेल्या या डेअरीने २०१९ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून कंत्राट मिळवले आणि ते २०२४ पर्यंत सुरू राहिले. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उघड केले की, २०१९ ते २०२४ पर्यंत तूप पुरवणाऱ्या 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीने' कधीही खरे दूध किंवा बटर खरेदी केले नाही, तर त्याऐवजी मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टर सारख्या रसायनांचा वापर करून कृत्रिम तूप तयार केले. डेअरीला ही रसायने पुरवणाऱ्या आरोपी अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही माहिती उघड केली आहे.
सीबीआयच्या अहवालानुसार, उत्तराखंडमधील भगवानपूर येथे असलेल्या या डेअरीचे संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट देशी तूप युनिट सुरु केले. खोटे दूध खरेदीचे रेकॉर्ड तयार केले. २०२२ मध्ये भोले बाबा डेअरीला काळ्या यादीत टाकल्यानंतरही, त्यांनी वैष्णवी डेअरी (तिरुपती), माल गंगा डेअरी (उत्तर प्रदेश) आणि एआर डेअरी फूड्स (तामिळनाडू) सारख्या इतर कंपन्यांद्वारे बनावट तूप पुरवणे सुरू ठेवले.
सीबीआय तपासात असेही उघड झाले की, जुलै २०२३ मध्ये टीटीडीने नाकारलेले तूप (प्राण्यांच्या चरबी असलेले) चे चार टँकर भोले बाबा डेअरीने लेबल बदलल्यानंतर मंदिरात पुन्हा पाठवले. जेव्हा एफएसएसएआय आणि सीबीआयच्या पथकाने तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एआर डेअरी प्लांटला भेट दिली तेव्हा त्यांना आढळले की नाकारलेले तूप परत केले गेले नाही तर वैष्णवी डेअरीजवळील स्थानिक दगड क्रशिंग युनिटमध्ये पाठवले गेले.ऑगस्ट २०२४ मध्ये, वैष्णवी डेअरीने तेच तूप प्रक्रिया केले, लेबल बदलले आणि ते तिरुपती मंदिरात पुन्हा पुरवले, जे नंतर भगवान वेंकटेश्वराच्या लाडू प्रसादात वापरले गेले.
आंध्र प्रदेशातील तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून अर्पण केलेल्या प्रसिद्ध तिरुपती लाडूमध्ये कथित भेसळ प्रकार मागील वर्षी उघडकीस आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. लाखो लोकांच्या श्रद्धेशी संबंधित या प्रकरणाचा राजकारण केले जाऊ नये, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसआयटी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, हे प्रकरण केवळ फसवणूक नाही तर धार्मिक श्रद्धेशी संबंधित गंभीर गुन्हा आहे. या संपूर्ण घोटाळ्यात कोणते सहभागी होते याची एजन्सी आता चौकशी करत आहे.
वादानंतर, तिरुपतीमधील लाडू प्रसादाबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. तथापि, मंदिर व्यवस्थापन - तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) २१ सप्टेंबर २०२४ रोजी दावा केला होता की, श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराचा प्रसाद आता पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र आहे. आम्ही ही शुद्धता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.