लखनौ : उत्तर प्रदेशमधील मैनापूर जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने 1981 मधील 24 दलितांच्या हत्या प्रकरणात तीनजणांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. या हत्याकांडात महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. फाशीशिवाय या तिघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
विशेष न्यायाधीश इंदिरासिंह यांनी तिघांना दोषी ठरवले होते. कप्तानसिंह (वय 60), रामपाल (60) आणि राम सेवक (वय 70) अशी त्यांची नावे आहेत. खाकी कपड्यातील दरोडेखोरांची 17 जणांची एक टोळी देहुली गावात 18 नोव्हेंबर 1981 रोजी शिरली. त्यांनी दलित कुटुंबांना लक्ष्य करत 24 जणांची निर्घृण हत्या केली. त्यात एका सहा महिन्यांच्या आणि दोन वर्षांच्या चिमुरड्यांचाही समावेश होता. मूळ एफआयआरमध्ये 17 आरोपींची नावे होती. त्यांच्यावर कलम 302 (खून), 307 (खुनाचा प्रयत्न) आणि कलम 396 (खुनासह दरोडा) असे आरोप ठेवण्यात आले. या एकूण आरोपींपैकी 13 जण खटल्याच्या काळात मरण पावले, तर एकजण फरार घोषित करण्यात आला. हा गुन्हा लैक सिंह या स्थानिक नागरिकाने नोंदवला. सखोल तपास करून संतोष आणि राधे या टोळीप्रमुखांसह 17 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
या घटनेने त्यावेळी देशात मोठी खळबळ उडाली होती. हत्या केलेल्या कुटुंबीयांची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट घेतली होती. तर, तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या सहानुभूतीसाठी देहुली ते सादूपूर अशी पदयात्रा काढली होती.