रामदास आठवले  Pudhari Photo
राष्ट्रीय

अक्षय शिंदे प्रकरणात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही : रामदास आठवले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-

‘अक्षय शिंदे प्रकरणात विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही. अक्षय शिंदेने केलेला प्रकार माणुसकीला कलंक लावणारा होता. सोमवारी त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडावी लागली. विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची गरज नाही,’ अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अक्षय शिंदे प्रकरणात संजय संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली होती, ‘एका शिंदेचा एन्काऊंटर पोलिसांनी केला तर दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल.’ यावरही रामदास आठवले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय एन्काऊंटर केला आहे आणि आता जनता महाविकास आघाडीचा राजकीय एन्काऊंटर करणार आहे,’ अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली.

मंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरवर बोलताना आठवले म्हणाले की, अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी माझ्यासह अनेकांनी केली होती. पोलिसांना स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडावी लागली, यात एक पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. तसेच याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वक्तव्य स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.

एक विधान परिषद, २ महामंडळ, १०-१२ विधानसभेच्या जागा...

जागा वाटपाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन मोठे पक्ष आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते आणि वरीष्ठ जागा वाटपाबाबत तोडगा काढतील. विधानसभा जागा वाटपामध्ये माझ्या पक्षाला १०-१२ जागा मिळाव्यात, तसेच दोन महामंडळ मिळावीत आणि राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी, अशी ही मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच या जागा मिळाल्या तर दलित मते महायुतीच्या बाजूने वळवण्यात मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी महायुतीसोबत यावे, आठवलेंची पुन्हा ऑफर

यावेळी प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, एका राज्यात पक्षाला मान्यता मिळावी एवढी मते प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला मिळाली नाहीत. ते सगळ्या जागी उमेदवार उभे करतात मात्र त्यांच्या जागा निवडून येत नाहीत. यापुर्वी महाविकास आघाडीने त्यांचा अपमान केला मात्र महायुती त्यांचा सन्मान करेल. त्यामुळे त्यांनी अन्य कुठे न जाता महायुतीसोबत येऊन विधानसभा निवडणूक लढवावी. ही माझी त्यांना ऑफर आहे, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT