नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे निर्माण झालेल्या नाराजीचा सूर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस हायकमांडने राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडून अहवाल मागवला आहे, अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात पक्षसंघटनेत बदल केले जाऊ शकतात. या नाराजीचा फटका पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बसण्याची शक्यता आहे. यावर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वातील कोणताही धोका पत्करायचा नाही. (Congress MLAs cross voting)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाला आमदारांच्या क्रॉस व्होटिंगचे कारण जाणून घ्यायचे आहे. दुसरीकडे, क्रॉस व्होट करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच दिले आहेत. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांची ओळख पटली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, अशा गोष्टींमुळे पक्षाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही नुकसान होऊ शकते. या कारणास्तव काँग्रेस नेतृत्वाला संघटनेतील अंतर्गत वाद वेळीच सोडवायचा आहे. क्रॉस व्होटिंगचे कारण संघटनेतील प्रदेशाध्यक्षांविरोधातील नाराजी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका महिला खासदाराने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची राहुल गांधींकडे तोंडी तक्रार केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने संघटनात्मक पातळीवर बदल होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. पण पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Congress MLAs cross voting)
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याच्या घटनेने राज्य संघटनेत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत दबाव वाढण्याची भीतीही काँग्रेस नेतृत्वाला वाटत आहे. तर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांपेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा विचार केला आहे.