नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एक बडा नेता केंद्रात येऊन अर्थमंत्री होणार असल्याचे कळते, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी केले. तर राज्यात महायुती सरकारमध्ये अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते आणि ते अजित पवार यांच्याकडे होते. मात्र आता अजित पवार नाहीत. जयंत पाटील अर्थ खाते सांभाळण्यासाठी सक्षम आहेत मात्र ते महाविकास आघाडीत आहेत, असेही वक्तव्य त्यांनी केले.
दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, फडणवीस-शिंदे यांची राज्यात युती असली तरी एकनाथ शिंदे राज्यातील नेत्यांना फारशी किंमत देत नाहीत. काहीही झाले तरी एकनाथ शिंदे थेट दिल्लीला येतात, असा टोला अंधारे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत घडामोडींबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. मात्र त्यांच्या पक्षात असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची विश्वासार्हता काय आहे? तटकरे यांच्या मुला-मुलींना पदे मिळाली. त्यांना आणखी काय हवे आहे? तटकरे अख्खा डबा गिळू शकतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही माझी इच्छा’
माझ्या आवडीने राजकारणात काही होणार असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे मला वाटते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. विविध नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांना कोणीही भेटू शकते.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह कोणालाही मुख्यमंत्र्यांची भेट घेता येते. तसेच विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.