नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पालकांना सल्ला दिला की, मुलांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांना संगीत किंवा तायक्वांदोसारख्या अनेक वर्गांना पाठवण्याऐवजी, पालकांनी थोडा वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधावा. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले.
"उन्हाळी सुट्टीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मुलांचे वर्गच सुरू असतात. त्यानंतर शाळा सुरू होते. मग त्यांनी उन्हाळी सुट्टीचा आनंद कधी घ्यायचा?" असा प्रश्न खंडपीठाने विचारला. न्यायालयाने नमूद केले की, मुलांना मूल्ये, शिष्टाचार आणि योग्य वागणूक यांचे शिक्षण देण्यासाठी, तसेच मुलांनी मुली व महिलांशी कसे वागावे हे शिकवण्यासाठी सुट्टीचा काळ हा एक उत्तम काळ ठरू शकतो.
मुलांच्या ताब्यासंबंधीच्या खटल्याची सुनावणी करत असताना, आईच्या वकिलाने जेव्हा असे निदर्शनास आणून दिले की मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासेतर वर्गांना उपस्थित राहावे लागते, तेव्हा न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, मुलांना अनेक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतचा दबाव हा पालकांमधील स्पर्धेचे स्वरूपही घेऊ शकतो. न्यायालयाने सुचवले की, मुलाच्या ताब्याबाबतचा वाद असूनही पालकांनी एकत्र येऊन आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करावा.