Supreme Court Judgment 2025
नवी दिल्ली : प्रत्येक मुलाला त्यांच्या पालकांचे प्रेम, मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. पालक वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असले तरीही मुलांना दोघांच्याही प्रेमाचा हक्क आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
वडिलांनी त्यांच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवानगी मागितलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ९ वर्षांचा मुलगा आयर्लंडमध्ये त्याच्या आईसोबत राहतो.
वडिलांची मागणी मान्य करत खंडपीठाने आदेश दिला की, आयर्लंडच्या वेळेनुसार वडील दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दोन तास व्हिडिओ कॉलवर मुलाशी बोलू शकतात. ही प्रक्रिया कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल याची खात्री दोन्ही पालकांनी करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले.
मुलाला त्याच्या वडिलांपासून किंवा आईपासून वेगळे केल्याने त्याच्या विकासावर आणि भविष्यावर वाईट परिणाम होतो. पालकांमधील भांडण मुलाला अनावश्यक संघर्षात ढकलते, जे त्याच्या आयुष्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे खंडपीठाने म्हटले. मुलाला वडिलांपासून दूर नेणे म्हणजे त्याला त्याच्या प्रेमापासून आणि मार्गदर्शनापासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले. मुलांची जबाबदारी आहे की त्यांनी आई आणि वडील दोघांच्याही संपर्कात राहावे जेणेकरून त्यांचा संतुलित विकास होऊ शकेल, असे खंडपीठाने म्हटले.