पुढारी ऑनलाईन डेस्क: नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अनेक महिन्यांपासून अंतराळात आहेत. त्यांच्यासोबत बुच विल्मोरही आहेत. तांत्रिक अडचणीमुळे या दोघांचाही अंतराळातील मुक्काम आणखी वाढला आहे. दरम्यान, नासाने त्याच्या परतीच्या विलंबाचे कारण दिले आहे. सुनिता विल्यम्स यांच्या परतीला उशीर होण्याचे एक कारण भारतीय वंशाच्या माजी अंतराळवी कल्पना चावला यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2003 मध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला अंतराळातून पृथ्वीवर परतत असताना अपघाताच्या बळी ठरल्या होत्या. कल्पना यांना परत आणणारे स्पेस शटल पृथ्वीवर येताच दुर्घटना झाली. या स्पेस शटलमध्ये आणखी सहा अंतराळवीर होते. यापूर्वी 26 जानेवारी 1986 रोजी स्पेस शटल चॅलेंजरचा स्फोट झाल्यानंतर असाच अपघात झाला होता. यामध्ये 14 अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही अपघातांमधून नासा काही धडे घेतले आहेत. त्यामुळेच आता नासाला सुनीता विल्यम्स यांना परत आणण्याची घाई करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही अपघातांचा उल्लेख करताना नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले की, आम्ही बोईंग स्टारलाइनर रिकामे परत आणत आहोत.नासाने कनिष्ठांचे ऐकून न घेण्याची आणि धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली होती; परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता सर्व शास्त्रज्ञांचे मत विचारात घेण्यात आले आहे. या कारणास्तव आता अंतराळवीर सुनीता आणि त्यांचे सहकारी बूचर यांना फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय नासाकडून घेण्यात आला आहे.
सुनीता विल्यम्सला अंतराळात घेऊन गेलेल्या स्टारलाइन कॅप्सूलची परतीची तारीख आता समोर आली आहे. नासा आणि बोईंगने आता निर्णय घेतला आहे की, स्टारलाइन कॅप्सूल 6 सप्टेंबर रोजी रात्री अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बर येथे उतरेल.