Sunil Tatkare Pudhari
राष्ट्रीय

Sunil Tatkare | आमच्या पक्षावर बोलण्याच्या इतरांना अधिकार नाही, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच : सुनील तटकरे 

पुढारी वृत्तसेवा

NCP National President

नवी दिल्ली : सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ पक्षनेत्या आणि उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमच्या पक्षाचा होता, त्यानुसार आम्ही काम केले. या संदर्भात इतरांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय देखील लवकर होईल आणि योग्य होईल, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. 

सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते. या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर ही भेट होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवारांना आश्वास्त केले की आम्ही तुमच्या सोबत आहोत. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी सोबत आल्याचे सांगितले. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे, अशा भावनाही मान्यवरांनी व्यक्त केल्या.

दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात बोलताना तटकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत राजकीय चर्चेचा आज प्रश्नच नव्हता. सध्या विलिनीकरणाच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. मात्र आम्ही आधीपासून विचारले की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भाजपवरोबर येणार का? आणि कोण कोणात विलीन होणार? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसताना जर तर वर भाष्य करणार नाही. राज्याला प्रगतीपथावर नेण्याची भूमिका अजित पवारांची होती. त्यानुसार आमही भाजपसोबत गेलो असलो तरी आमची मूळ भूमिका आणि विचारधारा सोडली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय पक्षाचा होता. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे. इतरांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. तसेच दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिला नाही. यावर विचार करून निर्णय घेऊ. कुठल्याही व्यक्तीला देशाचा किंवा राज्याचा मंत्री होताना त्यांच्याकडे सहा महिने अवधी असतो, अशा वेळी जेव्हा एखादे पद असते तेव्हा ते ठेवता येते. अजित पवारांच्या बाबतीत १९९१ साली हे झाले होते, असा दाखला त्यांनी दिला. 

अजित पवारांच्या अपघातावर बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार विकासाची दृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या निधनाचे दुःख सर्वांना आहे. त्यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. यातून सत्य समोर येईल. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरण व्हावे यावर चर्चा सुरू कोणी केली, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही घाई केली असे बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आम्ही आमची भूमिका यासंदर्भात योग्य वेळी मांडू, असेही ते म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT