सोमनाथ: गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर झालेल्या उद्घाटनाला आज 75 वर्षे पूर्ण झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट घेऊन महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेशीही संवाद साधला. सोमनाथ मंदिराला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांमुळे या मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला, असे पंतप्रधान मोदी सोमवारी म्हणाले.
देशाची ओळख आणि स्वाभिमानाशी निगडित असलेल्या अनेक स्थळांचा परकीय आक्रमकांनी इतिहासात विध्वंस केला. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्या त्या देशांतील नागरिकांनी एकत्र येत आपली ओळख आणि राष्ट्रीय गौरव पुन्हा प्रस्थापित केला; पण भारतात मात्र राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवरही राजकारण करण्यात आले, अशी टीका मोदींनी केली.
सोमनाथ मंदिराचा उल्लेख करताना, स्वातंत्र्यानंतर देशाने हाती घेतलेल्या पहिल्या मोठ्या कामांपैकी एक म्हणजे सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माण असल्याचे सांगण्यात आले. यासाठी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठे प्रयत्न केले.
मात्र, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून मोठा विरोध झाला होता, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच, सरदार पटेल यांच्या ठाम भूमिकेमुळेच तीव्र विरोध असूनही सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि शतकानुशतके लागलेला कलंक देशाने पुसून टाकला, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
पोखरण अणुचाचणीनंतरही भारत घाबरला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सोमवारचा दिवस आणखी एका कारणासाठी विशेष आहे. याच दिवशी, 11 मे 1998 रोजी, देशाने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. तेव्हा भारताला दडपण्यासाठी जगभरातील शक्ती पुढे आल्या होत्या. भारतासाठी सर्व मार्ग बंद झाले होते; पण आम्ही घाबरलो नाही, आम्ही ठाम राहिलो. भारताने पोखरण अणुचाचणीला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव दिले होते. कारण, शिवासोबत शक्तीची पूजा करणे ही आपली परंपरा आहे. मी भगवान सोमनाथांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ‘ऑपरेशन शक्ती’चे अभिनंदन करतो.
पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या कळसाचा पहिल्यांदा जलाभिषेक केला. 11 पवित्र ठिकाणांहून पाणी एका मोठ्या कलशात भरून 90 मीटर उंच क्रेनच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावर नेण्यात आले आणि तेथे कळसावर जलाभिषेक करण्यात आला.
सोमनाथ मंदिराच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीमने सोमनाथ मंदिरावर चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
हवाई दलाच्या कसरतींमध्ये नाशिक येथील बेस रिपेअर डेपोने तयार केलेले स्मोक पॉड्स हे मुख्य आकर्षण होते. या पॉड्सनी केशरी, पांढरा आणि हिरवा धूर सोडून आकाशात भारतीय तिरंग्याची प्रतिमा तयार केली.