पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविक ठार झाले तर ६० जखमी झाले. ( Mahakumbh Mela Stampede) या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला महाकुंभ मेळा परिसराचा आढावा घेतला. हा संपूर्ण परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच व्हीव्हीआयपी पास देखील रद्द करण्यात आले आहेत. शहरात चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे.
प्रयागराज महाकुंभातील संगम नदीच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आणि भाविकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. महाकुंभ मेळ्यात पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. महाकुंभ परिसर नो-व्हेइकल झोन (वाहनमुक्त क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे महाकुंभ परिसरातील गर्दी नियंत्रित करणे आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाकुंभ मेळा परिसर नो-व्हेहिकल झोन (वाहनमुक्त क्षेत्र)
वाहनांना व्हीव्हीआयपी पासने परिसरात प्रवेश नाही.
भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था.
बाहेरील जिल्ह्यांमधून येणारी वाहने प्रयागराजच्या सीमेवरच थांबवली जाणार.
४ फेब्रुवारीपर्यंत शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी.
महाकुंभमेळ्यातील पुढील अमृत स्नान ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला आहे. महाकुंभाला अमृत स्नानासाठी येणारी लाखो भाविक वाराणसी आणि अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस परिसरात भाविकांची अलोट गर्दी असणार आहे. २०१९ च्या कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजचे विभागीय आयुक्त म्हणून काम केलेले आशिष गोयल आणि एडीएचे माजी उपाध्यक्ष भानू गोस्वामी यांना वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.