तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण उदयनिधी आणि सत्ताधारी द्रमुक पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहेत.
High Court on Sanatan Dharma Controversy
चेन्नई : तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी 'सनातन धर्मा'चे निर्मूलन करण्याबाबत केलेले वक्तव्य हे एका प्रकारे नरसंहाराचे समर्थन करण्यासारखेच आहे.त्यांनी सनातन धर्माबाबत २०२३ मध्ये त्यांनी केलेले विधान हे 'द्वेषयुक्त भाषण' असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण आज (दि. २१) मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपाठाने नोंदवले. तसेच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात तमिळनाडू पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर (FIR) न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान, तमिळनाडूमध्ये मे महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहत असतानाच उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्हाषण उदयनिधी आणि सत्ताधारी द्रमुक पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहेत.
सप्टेंबर २०२३ मध्ये तामिळनाडूमधील एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. काही गोष्टींना केवळ विरोध करून चालत नाही, तर त्यांचे समूळ उच्चाटन करावे लागते. त्याचप्रमाणे सनातन धर्माचेही निर्मूलन केले पाहिजे," असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते.अमित मालवीय यांनी या भाषणाचा व्हिडिओ 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला होता. "हे विधान सनातन धर्माचे पालन करणाऱ्या भारतातील ८० टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराचे आवाहन आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरून मालवीय यांनी दोन गटांत शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तमिळनाडू पोलिसांनी त्यांच्यावर कलम १५३ अ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढताना म्हटले की, "गेल्या १०० वर्षांपासून द्रविड कळघम आणि त्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) कडून हिंदू धर्मावर सातत्याने हल्ला केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे देखील याच विचारधारेचे वारसदार आहेत."
द्वेषयुक्त भाषण करणाऱ्यांवर अनेकदा कारवाई होत नाही, तर त्याला प्रत्युत्तर देणाऱ्यांना कायद्याचा रोख सोसावा लागतो, अशी चिंताही न्यायालयाने यावेळी व्यक्त केली.न्यायालयाने नमूद केले की, "ज्यांनी द्वेषयुक्त भाषणाची सुरुवात केली ते मोकळे सुटतात, तर त्या विधानावर प्रतिक्रिया देणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा बडागा उगारला जातो, ही वस्तुस्थिती क्लेशदायक आहे. तमिळनाडूमध्ये या द्वेषयुक्त भाषणाबद्दल मंत्र्यांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, तर इतर राज्यांत काही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत."
उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट करताना मदुराई खंडपीठाने स्पष्ट केले की, "जर सनातन धर्माचे पालन करणाऱ्या विशिष्ट समुदायाचे अस्तित्व असू नये असे म्हटले जात असेल, तर त्यासाठी योग्य शब्द 'नरसंहार' हाच आहे. सनातन धर्माला जर धर्म मानले, तर त्याचे उच्चाटन म्हणणे म्हणजे 'धर्मसंहार' (Religicide) आहे. यामध्ये सांस्कृतिक संहाराचाही समावेश होतो. त्यामुळे 'सनातन ओळिप्पू' (सनातन निर्मूलन) या तमिळ शब्दाचा अर्थ स्पष्टपणे नरसंहार असाच होतो."
राज्य सरकारने उदयनिधींच्या विधानाचा बचाव करण्यासाठी महात्मा गांधी, कामराज, बुद्ध आणि रामानुज यांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. न्यायालयाने हा तर्क फेटाळून लावला. "महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू मानत असत. रामानुजाचार्य तर सनातन धर्माचे आधारस्तंभ होते. पेरियार वगळता इतर कोणत्याही महापुरुषाने सनातन धर्माच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात राजकीय रंग भरल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. "द्वेषपूर्ण भाषणाची सुरुवात करणाऱ्यांना मोकळे सोडले जाते आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडले जाते, ही परिस्थिती वेदनादायी आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता तटस्थ राहिले पाहिजे," अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना फटकारले.
उदयनिधी यांच्या विधानामुळे देशात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. आता न्यायालयाने याच भाषणाला या द्वेषयुक्त भाषणच असल्याचे स्पष्ट केल्याने तामिळनाडू या प्रकरणाला पुन्हा एकदा धार आली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सुरुवातीपासूनच आपल्या विधानाचे समर्थन केले होते. आपण लोकांच्या नरसंहाराचे आवाहन केलेले नसून सामाजिक विषमतेवर टीका केली आहे, असा दावा त्यांनी केला होता. आता राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहत असतानाच उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल उदयनिधी आणि सत्ताधारी द्रमुक पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहेत.