नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; सिंगापूरमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असून यामुळे बालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. परिणामी, सिंगापूरची हवाई सेवा बंद केली जावी, असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. सिंगापूरने केजरीवाल यांच्या विधानाची गंभीरपणे दखल घेत भारतीय राजदूताला पाचारण केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर केजरीवाल यांच्यावर भडकले आहेत. दोन देशांच्या संबंधावर परिणाम होईल, अशी विधाने केजरीवाल यांनी करू नयेत, असा सल्ला जयशंकर यांनी केजरीवाल यांना दिला आहे.
कोविड-१९ विरुध्दच्या लढ्यात भारत आणि सिंगापूर हे मजबूत सहयोगी आणि साथीदार आहेत. काही बेजबाबदार लोकांच्या विधानामुळे दोन देशांदरम्यानच्या दीर्घ संबंधांवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव अशा लोकांनी ठेवणे आवश्यक आहे, असा टोला जयशंकर यांनी केजरीवाल यांना उद्देशून मारला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भारतातर्फे बोलू नये, असा सल्लाही जयशंकर यांनी केजरीवाल यांना सोशल मीडियाद्वारे दिला आहे.