पुढारी ऑनलाईन डेस्क: वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.२२) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. NEET-UG 2024 परीक्षेतील दाेन्ही पर्यायांना गुण दिलेल्या प्रश्न क्रमांक १९ च्या उत्तरावर आपलं मत देण्यासाठी आयआयटी दिल्लीने तज्ज्ञांची समिती तयार करावी, या समितीने मंगळवारी दुपारपर्यंत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिले. दरम्यान, नीट पेपरफुटी व गैरप्रकार प्रकरणी पुन्हा मंगळवार, २३ जुलै राेजी सुनावणी हाेणार आहे.
"तन्वी सरवाल" प्रकरणात, तपास प्रलंबित असतानाही न्यायालयाने परीक्षा रद्द केली होती. असे स्पष्ट करत आज या परीक्षेबाबत आपण निर्णय घेतला नाही तर उमेदवारांची शक्यता केवळ अनिश्चित आणि तात्पुरतीच राहणार नाही, तर ते दीर्घकाळापर्यंत वेदना आणि चिंतेने त्रस्त राहतील. ज्या विद्यार्थ्यांची चूक नाही, त्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. नीट परीक्षेतून देशातील डॉक्टरांच्या भावी पिढी तयार होणार आहे. ते सार्वजनिक आरोग्याचे प्रभारी असतील, अभ्यासक्रमासाठी पात्र होण्यासाठी त्यांच्या मूळ गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाऊ शकत नाही." असेही याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी सांगितले.
नीट परीक्षेचा अभ्यासक्रम सोप झाला असेल तर ७२० पैकी ६५० पेक्षा अधिक गुण मिळविणारे ५० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. हा संपूर्ण प्रकार भविष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. जेव्हा एखाद्या रुग्णाला कर्करोग झाला आहे असा संशय येतो आणि त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करणे बाकी असते तेव्हा केमोथेरपी सुरु करणे चांगली ठरते. अन्यथा कर्करोगाच्या पेशी वाढण्याचा धोका अधिक असतो, असे याचिकाकर्त्यांचे वकील हेगडे यांनी सांगितले. पेपर फुटल्याचा पूर्वीचा इतिहास असलेली एक संघटित टोळी नीट पेपरफुटीमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. हे त्यांचे बिझनेस मॉडेल आहे. 'एनटीए'ने पेपरफुटी झाली असल्याचे वस्तुस्थिती नाकारली आहे. तसेच बिहार पोलिसांना सहकार्य केलेले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकत नाही की ती एक निष्पक्ष परीक्षा होती, असेही त्यांनी नमूद केले.
नीट परीक्षेत वाढीव गुण का दिले गेले, असा सवाल सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल यांना दिला. यावर त्यांनी सांगितले की, माझ्या मते तो योग्य निर्णय नव्हता. वेळेची समस्या असल्यास ग्रेस मार्क्स दिले जातील. नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि पुन्हा चाचणी घेण्यात आली.नीट परीक्षा पुन्हा घेण्याचा सर्वोच्च न्यायालया विचार करत नसेल तर किमान या परीक्षेत पात्र ठरलेल्या १३ लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील हुडा यांनी यावेळी केली.
यावेळी 'एनटीए'च्या वकिलांनी सांगितले की, काही केंद्रांमध्ये चुकीची प्रश्नपुस्तिका देण्यात आली. नंतर ती पुन्हा घेवून योग प्रश्नपुस्तिका वितरित केल्या गेल्या. असा प्रकार झालेल्या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेचे नुकसान झाल्याबद्दल ग्रेस गुण देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर (कॅनरा बँक) मध्यंतरी काढण्यात आला आणि SBI चा पेपर देण्यात आला त्यांनाच ग्रेस गुण देण्यात आले. असा प्रकार किती केंद्रांमध्ये झाला, असा सवाल या वेळी खंडपीठाने केला असता आम्ही याची माहिती सादर करु असे एनटीएच्या वकिलांनी सांगितले.
नितेश कुमार, अमित आनंद आणि सिकंदर प्रसाद यांच्या जबाबातून पेपर हा परीक्षेपूर्वीच फुटला असल्याचे सूचित होते, असा दावा ॲड. हुडा यांनी केला. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी अमित आनंद हा एक मध्यस्थ आहे. नीटची परीक्षा ५ मे रोजी होती. त्यापूर्वी एक दिवस म्हणजे ४ मेच्या रात्री तो विद्यार्थ्यांना गोळा करत होता. यावरुन असे सूचित होते की, विद्यार्थ्यांना ४ मेच्या रात्रीच उत्तरे लक्षात ठेवण्यास सांगितले जात होते याचा अर्थ नीट परीक्षाचा पेपर ४ मे पूर्वीच फुटला होता. पेपरफुटी ४ मेच्या रात्र झाले असेल तर साहजिकच ती वाहतुकीच्या माध्यमातून झाली नाही तर ती पेपर जेथे ठेवण्यात आले ोते त्या स्ट्राँग रूममधूनच झाली होती, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.
आज सुनावणीच्या प्रारंभी नीटपरीक्षेच्या केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकालाच्या आकडेवारीतून काय समोर आले?, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला. यावर याचिकाकर्त्यांचे वकील हुडा यांनी सांगितले की, आम्ही या निकालाच्या आधारे एक पत्रक सादर केले आहे. नीट परीक्षेचा पेपर व्हॉट्सॲपवर प्रसार झाल्याचे मान्य करतात. ४ जुलै राजी विद्यार्थ्यांना लीक झालेले पेपर देण्यात आल्याचे बिहार पोलिसांनी सादर केलेले पुरावे दर्शवतात. तसेच जेव्हा मी म्हणालो प्रश्नपत्रिका ई रिक्षाने घेतली होती. पण केंद्राने सांगितले ती 'ओएमआर' शीट्स होती, असे वकील हुडा म्हणाले यावर ई-रिक्षानेच प्रश्नपत्रिका नेली गेली ही एक वस्तुस्थिती आहे; परंतु लहानसा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वितरित केलेले चित्र हे OMR शीटचे होते, प्रश्नपत्रिकेचे नव्हते, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.