प्रथमेश तेलंग
नवी दिल्ली: भाजप-महायुती राज्यातील राज्यसभेच्या सातव्या जागेवर देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील धूसपूस लक्षात घेता महायुती हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नावांचा अहवाल त्यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी राज्यसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. तसेच महायुतीचा सातवा उमेदवार उतरवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली जाणार असेल तर महायुती उमेदवार देणार नसल्याचे समजते. भाजप आणि महायुती पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरेल, असे त्यांनी या भेटीनंतर सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यसभेत राज्यातील ७ जागा रिक्त झाल्या आहेत. या निवडणुका येत्या काळात होतील. महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा निवासस्थानी झाली होती. त्यात अनेक नावांची चर्चा झाली होती. त्या नावांचा अहवाल केंद्रीय नेत्यांकडे सादर करणे ही प्रथा आहे, तो अहवाल सादर केला. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. २ मार्च रोजी केंद्रीय निवडणुक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि जो निर्णय होईल तो राज्याला कळवला जाईल. त्यानुसार पुढचे निर्णय आम्ही घेणार आहोत. किती नाव केंद्रीय नेतृत्वाकडे दिली आहेत हे सांगणे उचित नाही, कारण ती नाव गोपनीय असतात. जुने आणि नवीन कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मानसिकता आहे की त्यांना संधी मिळावी. तो अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे दिला आहे.
राज्यसभेसाठी 'ही' नावे चर्चेत
राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, महायुतीकडून एक बड्या ओबीसी चेहऱ्याला राज्यसभेत पाठवले जाणार असल्याचे समजते.