नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीतील लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.२३) दुपारी मेट्रो रेल्वेने प्रवास केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधी यांनी या प्रवासात प्रवाशांशी बातचीत करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांनी मंगोलपुरी भागात प्रचाराला जाण्यासाठी मेट्रो धरली. प्रवास सुरु करताच त्यांनी प्रवाशांशी हितगुज केले. प्रवासातील अडचणी जाणून घेतल्या. राहुल गांधी यांना समोर बघताच काही युवकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. चिमुकल्यांचे लाड करून महिला, युवकयुवतींशी संवाद साधला. या मेट्रो प्रवासात राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैय्याकुमार, डॉ. उदित राज उपस्थित होते.
दिल्लीच्या प्रियजनांसह मेट्रोने प्रवास करुन त्यांची विचारपूस केली. आम्ही दिल्ली मेट्रो बनवण्याचा घेतलेला पुढाकार जनतेसाठी अत्यंत सोयीचा ठरल्याचे पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.