पुढारी ऑनलाईन डेस्क : "जातीय जनगणना, आरक्षणावरील ५०% मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत." अशी पोस्ट करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी, "छत्रपती शाहू महाराज यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे." म्हटलं आहे. (Rahul Gandhi)
कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे, "सामाजिक न्यायासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात एक अग्रणी, सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये याच दिवशी 'क्रांतिकारक राजपत्र' प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण सार्वत्रिक केले. त्याचबरोबर शाहू महाराजांनी ५०% नोकरीत आरक्षण देऊन समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्याचे काम केले. शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही झाला. संविधानात आरक्षणाचा समावेश करण्यात आला. जातीय जनगणना, आरक्षणावरील ५०% मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत."
१२२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २६ जुलै १९०२ रोजी करवीर (Kolhapur) संस्थानचे राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी एक ऐतिसासिक निर्णय घेतला होता. १९०२ मध्ये त्यांनी करवीर संस्थानात आदेश देत बहुजन समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत ५० टक्के आरक्षण दिले होते. देशातला तो आरक्षणाचा पहिला निर्णय होता. त्यांच्या या निर्णयाने सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली.