नवी दिल्ली : दिल्लीतील १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर मृतदेह मोकळ्या मैदानात फेकून देण्यात आला होता. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे. राजधानीत एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांना अनेक दिवस याची माहिती मिळाली नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर पोस्ट करत दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. गृहमंत्री म्हणून दिल्ली पोलिस अमित शाह यांच्या नियंत्रणाखाली आहेत. मग महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी अखेर कोणाची?” असा थेट सवाल त्यांनी अमित शाह यांना केला.
गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी
दिल्ली आता केवळ देशाची राजधानी राहिलेली नसून, महिलांसाठी दररोजच्या भीतीदायक वास्तवाची कहाणी बनली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दिल्ली पोलिसांचे काम सर्वसामान्य नागरिकांना घाबरवणे एवढेच राहिले आहे का? गुन्हेगार मात्र निर्भयपणे फिरत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई आणि शिक्षा करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील कथित प्रशासकीय निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.