नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अमेरिका दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने आरएसएस आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मोदी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यासोबतच देशातील विविध धर्मांमधील वाढत्या संघर्षावरही त्यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या बोलण्याने संपूर्ण एनडीए गोटात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या बचावासाठी भाजपच नाही तर एनडीएचे (Rahul Gandhi on NDA) इतर मित्रपक्षही मैदानात उतरले आहेत.
लोजप पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार करत आरक्षण संपवणे सोडा, त्याबद्दल विचार करणेही गुन्हा आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाची मानसिकता उघड झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण रद्द करणे हे काँग्रेसचा प्राधान्यक्रम आहे. घटनात्मक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आरक्षण रद्द करणे सोडा, त्या तरतुदीशी छेडछाड करण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा हा काँग्रेसचा निवडणूक नारा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्ता असूनही काँग्रेसला ना जाती जनगणना करता आली ना ओबीसी आरक्षण लागू करता आले असल्याचा पलटवार पासवान (Rahul Gandhi on NDA) यांनी केला.
शिख धर्मातील पगडी आणि कडा याविषयीच्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी निषेध केला. काँग्रेस राजवटीत झालेल्या १९८४ च्या शीख विरोधी दंगलीचा संदर्भ देत पुरी यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. शीख धर्माला १९८४ च्या दंगलीवेळी एक समुदाय म्हणून चिंता, असुरक्षितता आणि अस्तित्व धोक्याची भावना जाणवल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लढा राजकारणाचा नाही. भारतात शीखांना पगडी घालण्याची परवानगी द्यायची की कडा यावरून लढा संपला आहे. हे फक्त शीखांसाठी नाही तर सर्व धर्मांसाठी आहे. ते म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताकडे वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह म्हणून पाहण्याचा "गैरसमज" करतात, असा आरोप गांधी यांनी केला. त्याचबरोबर आरक्षणाबाबत काँग्रेसचे मतही त्यांनी सांगितले. भारतातील आरक्षण संपवण्याचा विचार काँग्रेस करेल जेव्हा देश "योग्य ठिकाणी" असेल. पण सध्या तसा विचार नसल्याचे ते म्हणाले.