नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आहे. त्यांचे स्मारक उभारण्याबाबत राजकीय गोंधळ सुरूच आहे. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी परदेशात गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यावरून त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
भाजपने काँग्रेसवर केलेला हा दुसरा थेट हल्ला आहे. याच्या एक दिवस आधी भाजपने काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवारावर मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनात गांधी कुटुंबातील एकही सदस्य सहभागी झाला नाही, असा आरोप भाजपने केला होता.
भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी नवा हल्ला चढवला, एकीकडे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक करत आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी नववर्ष करीत असल्याचे मालवीय म्हणाले. गांधी परिवार आणि काँग्रेस शिखांचा द्वेष करतात. इंदिरा गांधींनी दरबार साहिबची विटंबना केली होती हे कधीही विसरता कामा नये, असेही मालवीय यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपच्या आरोपांवर काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर म्हणाले, संघाचे लोक 'विचलित' राजकारण कधी थांबवणार? भाजपने मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी यमुनेच्या काठावर जागा देण्यास नकार दिला. हे योग्य आहे काय? राहुल गांधी वैयक्तिक दौऱ्यावर गेले तर तुम्हाला काय अडचण आहे? नवीन वर्षात तुमचे मन चांगले राहो हीच सदिच्छा