Rahul Gandhi on CBSE Result
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
सीबीएसई परीक्षा निकालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या निकाल प्रक्रियेची जबाबदारी कॉम्प्ट या कंपनीवर होती. हीच कंपनी यापूर्वी ग्लोबरनिया या नावाने २०१९ मध्ये तेलंगणामध्ये वादात सापडली होती. पुढे नाव बदलले, पण पद्धत तीच राहिली, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सोशल मीडियावर व्यक्त होत राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना धक्का बसल्याचे म्हटले आहे. निकाल देणाऱ्या कंपनीचा इतिहास माहित असतानाही या कंपनीला १८.५ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी का देण्यात आली?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच घडलेला प्रकार चूक नसून पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारपुढे आणखी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. कंपनीला काम देण्याची प्रक्रिया, पार्श्वभूमी तपासणी आणि सरकारशी असलेल्या कथित संबंधांबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली. विद्यार्थ्यांची मेहनत आणि भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. या कथित गैरव्यवहाराच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कॉम्प्ट कंपनीला सीबीएसईचे काम का आणि कोणाच्या शिफारशीवर देण्यात आला?
कोणते नियम आणि प्रक्रिया बाजूला ठेवून या कंपनीला ठेका देण्यात आला?
कॉम्प्ट ही यापूर्वी ग्लोबरनिया नावाने वादात अडकली होती, याची माहिती सीबीएसईला नव्हती का?
कंपनीची पार्श्वभूमी तपासणी का करण्यात आली नाही?
कॉम्प्ट व्यवस्थापन आणि केंद्र सरकारमध्ये नेमके संबंध काय आहेत?