नवी दिल्ली : आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा मांडायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या सोबतीने भाजपने निवडणूक चोरली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला. याबरोबर तृणमूल काँग्रेसच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना देखील त्यांनी समज दिली.
काँग्रेसमधील काही जण आणि इतर काही लोक, तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे – आसाम आणि बंगालचा जनादेश चोरणे, हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा कोणत्याही एका पक्षाचा नाही तर यापेक्षाही व्यापक आहे, असे त्यांनी म्हटले.
आसाम आणि पश्चिम बंगाल ही अशी स्पष्ट उदाहरणे आहेत, जिथे निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने निवडणूक चोरली आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हीच कार्यपद्धती आम्ही पाहिली आहे. निवडणूक चोरी, संस्थांची चोरी – आता याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच काय उरला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.