राष्ट्रीय

Pellet Gun Controversy : राहुल आणि प्रियंका गांधींच्या ठाम भूमिकेनंतर अखेर दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल; अज्ञातांविरोधात FIR

संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनानंतर कारवाई; जखमी विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पॅलेट गन (छर्रे) गैरवापर प्रकरणात अखेर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२० जुलै रोजी कनॉट प्लेस आणि जंतर-मंतर परिसरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान १९ वर्षीय साहिल लोचब हा गंभीर जखमी झाला होता. सुरक्षा दलांच्या कारवाईदरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यात साहिलच्या चेहऱ्यावर आणि उजव्या डोळ्याच्या भागात छर्रे घुसले होते. घटनेनंतर त्याच्यावर लेडी हार्डिंग रुग्णालयात डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याला काळा चष्मा वापरावा लागत आहे. साहिल हा दिल्ली विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’चा विद्यार्थी असून त्याने २०२४ मध्ये पोलीस भरतीची परीक्षा दिली होती; मात्र पेपरफुटीमुळे ती रद्द झाल्याने तो या आंदोलनात सहभागी झाला होता.

न्यायासाठी आईची पायपीट आणि पोलिसांची टाळाटाळ

साहिलची आई ज्योती या गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवत होत्या. "पोलिसांनी गोळीबार किंवा छर्रे झाडले नाहीत, तर मग माझ्या मुलाच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात छर्रे कसे घुसले?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता. १४ ऑगस्टपासून त्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवून केवळ फेऱ्या मारायला लावल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा आणि ठिय्या

साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरू असलेली फरफट पाहून राहुल गांधी शुक्रवारी स्वतः साहिल, त्याचे कुटुंबीय आणि कायदेशीर सल्लागारांसह संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन गुन्हा नोंदवण्याची आणि तपास अधिकाऱ्यांचा (आयओ) संपर्क क्रमांक देण्याची ठाम मागणी केली. "जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही," असा इशारा देत राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या दिला.

अखेर पोलिसांची माघार आणि पुढील तपास

विरोधी पक्षाचा वाढता दबाव आणि आक्रमक आंदोलनानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी माघार घेत साहिलच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या कारवाईमुळे आता आंदोलनादरम्यान नेमके छर्रे कोणी झाडले आणि विद्यार्थ्यांच्या दुखापतीस कोण जबाबदार आहे, याचा सखोल तपास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT