क्वालालम्पूर; (पीटीआय) : भारतातील गुंतवणुकीसाठी मलेशियन व्यावसायिकांनी बोलून दाखवलेली इच्छा आणि त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. तसेच भारताने देऊ केलेल्या विशेषतः पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, एआय आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रातील संधींचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी मलेशियातील व्यावसायिकांना केले.
मोदींनी अलीकडच्या वर्षांत भारतात व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थिर, कार्यक्षम आणि व्यवसायिक आणि धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रम आणि सुधारणांवर प्रकाश टाकला. मोदी यांनी मलेशियातील आघाडीच्या व्यावसायिक नेत्यांची भेट घेतली. भारताच्या विकासात त्यांनी बोलून दाखवलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. भारत आणि मलेशियामधील वाढती व्यावसायिक भागीदारी आणि भारतीय विकासात मलेशियन कंपन्यांनी दाखवलेला रस याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोदींनी पेट्रोनासचे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ तेंगकू मुहम्मद तौफिक, बेरजया कॉर्पोरेशन बेरहदचे संस्थापक विन्सेंट टॅन ची यियुन, खजानाह नॅशनल बेरहदचे व्यवस्थापकीय संचालक अमीरुल फैसल वान झहीर आणि फिसन इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक पुआ खेइन सेंग यांची भेट घेतली. तेंगकू मुहम्मद तौफिक यांच्याशी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियासह अक्षय ऊर्जा आणि स्वच्छ इंधनात ऊर्जा भागीदारी आणि नवीन संधी मजबूत करण्यावर चर्चा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.
पेट्रोनासची भारतात तीन दशकांपासून कार्यरत आहे. एलएनजी, पेट्रोकेमिकल्स आणि उदयोन्मुख हरित ऊर्जा उपायांमध्ये वैविध्यपूर्ण योगदान देत आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतातील गतिमान सेवा आणि ग्राहक क्षेत्रात ‘बर्जया’ आणखी काम करण्यास उत्सुक आहे, अशी इच्छा व्हिन्सेंट टॅन ची यियोन यांनी मोदी यांच्या समोर बोलून दाखवली. फिसनचे पुआ खीन सेंग यांनी सेमीकंडक्टर उद्योगासह भारतातील वेगाने वाढणार्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.