नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरमधील हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्याचा अधिकृत तपशील जाहीर झाला नसला तरी स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
मागील अडीच वर्ष मणिपूर धुमसत आहे. दरम्यान, मणिपूर अशांततेचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्षांनी सातत्याने पंतप्रधान मोदी मणिपूरला कधी जातील, यावर विचारणा केली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान या दौऱ्यामध्ये मणिपूरसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हा मणिपूरच्या लोकांचा अपमान, काँग्रेसची टीका
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. २९ महिन्यांनंतर पंतप्रधान मणिपूर भेटीत फक्त ३ तास घालवणार आहेत. हा मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदी राज्यात फक्त ३ तास घालवतील. इतक्या घाईघाईत केलेल्या या भेटीतून त्यांना काय साध्य होण्याची अपेक्षा आहे? हा प्रत्यक्षात राज्यातील लोकांचा अपमान आहे, त्यांनी २९ महिने त्यांची वाट पाहिली आहे, असेही रमेश म्हणाले.