पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचा आजचा विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीतील लोकांमध्ये आज उत्साह दिसून येत आहे. भाजपवर संपूर्ण देशाचा विश्वास असल्याचे आजच्या निकालामुळे सिद्ध झाले आहे. आता डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करेल. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज दिल्लीतील अभूतपूर्व विजयावर (दि.८) दिली.
राजधानी दिल्लीत भाजपने २७ वर्षानंतर विजय मिळविल्यानंतर दिल्ली भाजप मुख्यालयात उत्सवाचे वातावरण आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रशासन म्हणजे नौटंकीचा मंच नाही, असा निशाणा आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता साधला. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारने कायदा सुव्यवस्था आणली. महाराष्ट्र जलयुक्त योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त केला. जनतेने हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीत नवा इतिहास रचला आहे. एनडीएला देशातील नारीशक्तीचा पाठिंबा असून नारीशक्तीचा आशीर्वाद आमचे सुरक्षा कवच आहे. बहुमत मिळालेल्या राज्यामध्ये भाजपने विकास केला आहे, असेही ते म्हणाले.