petrol diesel crisis
नवी दिल्ली : जगभरातील सुरू असलेल्या संघर्षांमुळे ऊर्जा क्षेत्रावर परिणाम होत असून, यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे मोठे संकट निर्माण होत असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २९) 'मन की बात'च्या माध्यमातून दिला.जगाच्या विविध भागांत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती
'मन की बात'च्या १३२ व्या भागात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मार्च महिना जागतिक स्तरावर अत्यंत घडामोडींचा राहिला आहे. गेल्या काळात कोरोनामुळे संपूर्ण जगाला प्रदीर्घ काळ अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जग एका नव्या सुरुवातीसह प्रगतीच्या पथावर पुढे जाईल, अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती; परंतु जगाच्या विविध भागांत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत राहिली."
"सध्या आपल्या शेजारील क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून भीषण युद्ध सुरू आहे. या देशांमध्ये, विशेषतः आखाती देशांमध्ये लाखो भारतीय कुटुंबांचे नातेवाईक वास्तव्यास आहेत आणि तिथे काम करत आहेत. तिथे असलेल्या १ कोटींहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवल्याबद्दल मी आखाती देशांचा अत्यंत ऋणी आहे. ज्या भागात हे युद्ध सुरू आहे, ते आपल्या ऊर्जा गरजांचे मुख्य केंद्र आहे. यामुळेच आता जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण होत आहे."या आव्हानांनंतरही भारताची स्थिती मजबूत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, "जागतिक संबंध, विविध देशांचे सहकार्य आणि गेल्या दशकात देशाने निर्माण केलेली क्षमता यामुळे भारत या आव्हानांचा खंबीरपणे सामना करत आहे."
देशातील जनतेला एकजुटीचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा काळ निश्चितच आव्हानात्मक आहे. मी देशवासीयांना पुन्हा एकदा विनंती करतो की, आपण सर्वांनी एकत्र येऊन या आव्हानावर मात करावी. १४० कोटी जनतेच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर आपण या कठीण परिस्थितीतून नक्कीच यशस्वीपणे बाहेर पडू. या विषयावर कोणीही राजकारण करू नये. हा १४० कोटी नागरिकांच्या हिताचा प्रश्न आहे. यात स्वार्थाच्या राजकारणाला स्थान नाही. जे अफवा पसरवत आहेत, ते देशाचे नुकसान करत आहेत. अफवांना बळी न पडता सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा," असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.
पंतप्रधानांनी हस्तलिखितांची माहिती गोळा करण्यासाठी 'ज्ञान भारतम सर्वेक्षणा'बद्दल माहिती दिली. नागरिक 'ज्ञान भारतम' ॲपद्वारे आपल्याकडे असलेल्या प्राचीन हस्तलिखितांची माहिती किंवा फोटो शेअर करून या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. T भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. गुलमर्ग आता क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनत असून 'खेलो इंडिया विंटर गेम्स'मुळे या भागाला नवी ओळख मिळाली आहे. तेथील तरुणांमध्ये फुटबॉलचीही क्रेझ वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता १०० पेक्षा कमी दिवस उरले आहेत, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी आरोग्यावर लक्ष देण्याचे आवाहन केले. "साखरेचे सेवन कमी करा आणि स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करा. हे छोटे प्रयत्न तुम्हाला लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर ठेवतील," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.