पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज (दि.२१) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज रात्री भारतात येण्यासाठी रवाना होतील. नियोजित दौऱ्यानुसार ते उद्या रात्री परतणार होते, परंतु आता ते बुधवारी सकाळी लवकर भारतात पोहोचतील.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या 'X' अकाउंटवरून ट्विटद्वारे म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. बाधित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही. त्यांना शिक्षा होईल. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादांविरूद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.