पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्या २५जून आहे. हा दिवस भारतीय लोकशाहीवरील हा काळा डाग असून, भारताच्या लोकशाहीला लागलेल्या डागाला उद्या ५० वर्ष पूर्ण होत आहेत, अशी शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती हल्ला केला. आज ( दि. २४) १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी ते बोलत होते. दरम्यान, संसदेच्या आवारात सरकारविरोधात निदर्शने करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आणीबाणी काळात भारतीय राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली. राज्यघटनेचा प्रत्येक भाग फाडला गेला. देशाचे रुपांतर तुरुंगात झाले. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली. या प्रकाराला भारताची नवीन पिढी कधीही विसरणार नाही.
आपल्या राज्यघटनेचे रक्षण करताना, भारतातील लोकशाहीचे, लोकशाही परंपरांचे रक्षण करतानाच, ५० वर्षांपूर्वी भारतात पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा संकल्प देशवासीय घेतील. भारतीय राज्यघटनेच्या निर्देशानुसार आम्ही सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्त्युत्तर दिले. त्यांनी आपल्या Xपोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी आज नेहमीच्या प्रथेपेक्षा लांब भाषण केले. नैतिक आणि राजकीय पराभवानंतरही अहंकार कायम आहे!अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदीजी काहीतरी बोलतील, अशी देशवासीयांची अपेक्षा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपर लीकबद्दल ते तरुणांबद्दल थोडी सहानुभूती दाखवतील, परंतु त्यांनी त्यांच्या सरकारच्या मोठ्या प्रमाणात हेराफेरी आणि भ्रष्टाचाराची कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
"तुम्ही आम्हाला 50 वर्ष जुन्या आणीबाणीची आठवण करून देत आहात; परंतु गेल्या दहा वर्षांच्या अघोषित आणीबाणीचा विसर पडला आहे. ही अघोषित आणीबाणी जनतेने संपवलीआहे. देशातील लोकांनी मोदींच्या विरोधात जनादेश दिला आहे. असे असूनही, ते पंतप्रधान झाले असतील तर त्यांनी काम करावे. आम्ही सभागृहात, रस्त्यावर आणि सर्वांसमोर लोकांचा आवाज उठवत राहू," असे खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.