PM Modi Independence Day speech:
नवी दिल्ली: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असल्याचे सांगितले. डिजिटल क्रांती आणि नवसंशोधनाच्या जोरावर भारताने जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण केला असून, आगामी काळात 'मेड इन इंडिया ६जी' आणि सेमीकंडक्टर निर्मितीच्या जोरावर भारत या क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा नवा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "गेल्या १२ वर्षांत देशातील मोबाईल निर्मिती तब्बल ३३ पटीने वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सात पटीने वाढ झाली असून, देशात लवकरच ६ ते ७ सेमीकंडक्टर प्लांट्स साकारले जात आहेत." याशिवाय, देशातील डेटा सेंटरच्या कामालाही मोठी गती मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज अॅपल आणि सॅमसंग सारख्या जगातल्या आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत. देशात तयार झालेले 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन आता मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केले जात आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
"तंत्रज्ञानासोबतच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताने मोठी कामगिरी केली आहे. पंतप्रधानांच्या मते, गेल्या १२ वर्षांत देशाचे संरक्षण उत्पादन चार पटीने वाढले आहे. १४० कोटी देशवासीयांची ही गती आणि आत्मविश्वास आता कुणीही रोखू शकत नाही. तंत्रज्ञान असो वा इतर कोणतेही क्षेत्र, भारत आता वेगाने पुढे जात आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, एका वर्षाच्या आत १ कोटी तरुणांना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल.