नवी दिल्ली : पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री घेणे हे अनादराचे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर पुढील अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळात सुनावणी होणार असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
सोमवारी, निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी समितीच्या बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसमोर एक असहमती पत्र सादर केले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. यासंबंधी त्यांनी एक्सवर पोस्ट करुन पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कार्यकारी हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या स्वतंत्र निवडणूक आयोगाचा सर्वात मूलभूत पैलू म्हणजे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची प्रक्रिया आहे, असे बैठकीत सादर केलेल्या असहमती पत्रात राहुल गांधी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकून, मोदी सरकारने आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेबद्दल लाखो मतदारांच्या चिंता वाढवल्या आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या राष्ट्राच्या संस्थापक नेत्यांचे आदर्श राखणे आणि सरकारला जबाबदार धरणे माझे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. निवड समितीची रचना आणि प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.