अमरावती : पुढारी ऑनलाईन
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी मार्गातील वाहतूक थांबवण्यात आली, मात्र यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. असा आरोप करण्यात येत आहे की, पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे ट्रॅफिक जॅम झाले आणि ५० हून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब झाला. JEE (Main) 2025 ची परीक्षा देता न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अडचणीत आले आहे. ही घटना विशाखापट्टणमची आहे. या प्रकरणी स्वत:हा पवन कल्याण यांनीचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
येथील ION डिजिटल झोन बिल्डिंगमध्ये विद्यार्थ्यांची एक महत्वपूर्ण परीक्षा होती. परीक्षा सकाळी 8:३० वाजता सुरू होणार होती. बी कलावती नावाच्या एका महिलेने सांगितले की, त्यांच्या मुलाला NIT मध्ये ॲडमिशनसाठी JEE (Main) परीक्षा द्यायची होती. मात्र ट्रॅफिक जॅममुळे त्याला पोहोचण्यास विलंब झाला.
कलावती यांनी सांगितले की, आम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकलो. पवन कल्याण या रस्त्यावरून जाणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती. ताफ्यासाठी या ठिकाणचे रस्ते मोकळे करण्यात आले. कलावती पुढे म्हणाल्या की, सकाळी ७ : ५० वाजता NAD जंक्शनवर पोहोचलो होतो. मात्र परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ४२ मिनीटे लागली. त्यामुळे आम्ही लेट झालो. त्यामुळे आम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही.
कलावती यांनी सांगितले की, जवळपास ३० विद्यार्थ्यांना यामुळे फटका बसला आहे. पुन-पुन्हा विनंती करूनही आम्हाला आत प्रवेश दिला नाही. आणखी एका पालकाने सांगितले की, जर परीक्षा केंद्रातील लोकांनी आम्हाला पाच मिनिटांची सूट दिली असती, तर माझ्या मुलीच वर्ष वाया गेलं नसतं. यातील काही पालकांनी अशी मागणी केली आहे की, पवन कल्याण यांनी नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार करावा.
दरम्यान विशाखापट्टणम पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पवन कल्याण यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे विद्यार्थ्यांना लेट झालेला नाही. उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी 8:41 वाजता या परिसरातून पार पडला. तर विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजल्यापासून ८:३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी म्हंटलंय की, त्यांच्या दौऱ्यामुळे लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यांनी पोलिसांना निर्देश दिले की, नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान काही वेळासाठीच वाहतूक थांबवावी. पक्षाने कार्यकर्ते आणि नेत्यांना सांगितले आहे की, क्रेनने पुष्पहार घालण्यासारखे कार्यक्रम करू नयेत. अशी कोणतीही कृती करू नका ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होईल.