उमेश कुमार
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनी देशाच्या राजकीय दिशेला निर्णायकपणे भाजपकडे वळवले आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत नवा अध्याय लिहिला, तर आसाममध्ये सत्तेवरील पकड अधिक मजबूत केली. पुद्दुचेरीत सहयोगींसह सत्ता राखली. दुसरीकडे, केरळमध्ये काँग्रेसने आपली स्थान टिकवले, तर तामिळनाडूमध्ये बदलाच्या राजकारणाने विजय मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच करिष्मा ही भाजपसाठी जमेची बाजू ठरली. पश्चिम बंगाल विधानसभा नवडणुकीने भारतीय राजकारणातील स्थापित समीकरणे बदलून टाकली. हे फक्त सत्तांतर नाही, तर दीर्घकाळ चाललेल्या राजकीय ढाच्याचा शेवट आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे. ज्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची पकड जवळपास अभेद्य मानली जात होती, ती भाजपने मोडून काढली. भाजपने या विजयाची पायाभरणी नव्वदच्या दशकातच केली होती. बाबरी मशीद प्रकरणानंतर बंगाल राजकारणासाठी अनुकूल मानला जात होता, पण कमळ फुलायला 30 वर्षांहून अधिक काळ लागला.
भाजपने बंगालमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक रणनीती आखल्या. सुरुवातीला विविध प्रतीकात्मक उपक्रमांद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, 1997-98 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या उदयानंतर भाजपला नवी दिशा मिळाली. डाव्या पक्षांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने त्यांच्याशी हातमिळवणी केली. काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि भाजप स्वतःच्या बळावर सत्ता स्थापनेपर्यंत पोहोचली. या विजयामागील रणनीती समजून घेण्यासाठी भाजपच्या नियोजनाकडे पाहावे लागेल. मागील पराभवानंतरच पक्षाने तयारी सुरू केली होती. सांस्कृतिक अभियाने, जनसंपर्क आणि मतदारांवर लक्ष केंद्रित करून मजबूत पाया तयार करण्यात आला. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सुनील बंसल यांच्यासारख्या संघटनात्मक नेत्यांनी बूथ स्तरापर्यंत काम केले.
भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्याऐवजी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांविरोधात मोहीम राबवली. अनेक पत्रकार परिषदांद्वारे भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलले गेले. परिणामी तृणमूलला अनेक उमेदवार बदलावे लागले. निवडणूक ‘ममता विरुद्ध जनता’ऐवजी ‘तृणमूल विरुद्ध जनता’ अशी बनवण्यात आली. निवडणुकीदरम्यान मुद्द्यांची दिशा वेगाने बदलली आणि धार्मिक राजकारण पुढे आले. धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून ध्रुवीकरण वाढवले गेले. नागरिकत्व, घुसखोरी आणि लोकसंख्यात्मक बदल यांसारखे मुद्देही प्रभावी ठरले. ममता बॅनर्जी यांच्या पराभवामागे भ्रष्टाचार, घोटाळे आणि प्रशासनातील कमतरता ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. अंमलबजावणी यंत्रणांच्या कारवाईत उघड झालेल्या प्रकरणांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला.
संघटन विस्तारावर भर
भाजपने संघटन विस्तारावर भर दिला. स्थानिक नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये संतुलन राखत पक्षाने सामाजिक आणि भौगोलिक विस्तार साधला. सांस्कृतिक आणि भावनिक मुद्द्यांचा प्रभावी वापर करून बंगाली ओळखीची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. रामनवमी, ‘जय श्रीराम’ यांसारख्या घोषणांनी निवडणूक अधिक ध्रुवीकृत केली, ज्याचा फायदा भाजपला झाला. निकालांनी या संपूर्ण रणनीतीच्या यशाची साक्ष दिली आहे.
सुनील बन्सल ः भाजपचे ‘इलेक्शन इंजिनिअर’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या नेत्रदीपक विजयाचे मुख्य शिल्पकार सुनील बन्सल, पक्षाच्या अलीकडील निवडणूक यशातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत बहुमताकडे कूच केली आहे. या विजयात अनेक नेत्यांचे योगदान असले तरी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बन्सल यांना या यशाचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट (मुख्य रणनीतीकार) मानले जात आहे.