नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये संबोधित करताना दहशतवादाविरोधात सरकारचा झिरो टॉलरन्स असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कोणत्याही दहशतवाद्याला सोडणार नाही, असे शाह म्हणाले. आसामच्या बोडो समुदायाचे उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
१९९० च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवाद चालवणाऱ्यांविरुद्ध पंतप्रधान मोदींनी झीरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. सरकार त्यांच्याविरुद्ध जोरदार लढा देत आहे. देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. हा भ्याड हल्ला करून हा त्यांचा मोठा विजय झाला आहे असे गुन्हेगारांना वाटत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही, असे शाह म्हणाले.
गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. हे केवळ त्यांच्या कुटुंबियांचे दुःख नाही तर संपूर्ण देशाचे दुःख आहे. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतो. जर गुन्हेगारांना वाटत असेल की ते जिंकले आहेत, तर ते चुकीचे आहेत. प्रत्येक नुकसानाचा बदला घेतला जाईल असे ते म्हणाले. देशाच्या कोणत्याही भागात दहशतवाद टिकू दिला जाणार नाही आणि तो मुळापासून नष्ट केला जाईल. भारतातील १४० कोटी जनता दहशतवादाविरोधात सरकारसोबत आहे. जगभरातून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा आहे, असे अमित शाह म्हणाले.